जळगाव जामोद, ता. प्रतिनिधी
तालुक्यातील नवीन माहुली गावठाणा जवळ गौण खनिजाने भरलेले टिप्पर तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत तहसील कार्यालयात लावले आहेत. दरम्यान रॉयल्टी नसताना अद्यापही दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जिगाव प्रकल्प अंतर्गत नवीन माहुली गावठाणा जवळ गौण खनिजाने भरलेले तीन ते चार टिप्पर तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी पकडले. चौकशी केली असता टिप्पर चालकांकडे कसलीही रॉयल्टी नव्हती, त्यामुळे तहसीलदार पवन पाटील यांच्या आदेशावरून संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी हे सर्व टिप्पर स्थानिक तहसील कार्यालय समोर लावले आहेत. रॉयल्टी नसल्यामुळे त्यांच्यावर तहसीलदारांनी तात्काळ दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असताना अद्यापही कार्यवाही न झाल्याने कुठेतरी पाणी मुरत आहे का? अशी चर्चा नागरिकात आहे. दरम्यान यासंदर्भात तहसीलदार पवन पाटील यांच्यासोबत संपर्क केला असता, मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी गौण खनिज अर्थात
गीट्टी भरलेले तीन ते चार मोठे टिप्पर तहसील कार्यालयासमोर आणून उभे केले आणि एक मुरूम व रेतीच्या ट्रॅक्टर सुद्धा पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे. ह्या सर्वांना त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबाबत नोटीस बजावण्यात येईल आणि नंतर काय ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार पवन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.