जळगांव जामोद (प्रतिनिधी):-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृषी अधिकारी व विक्रेते यांनी संगनमताने प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन घोटाळा केल्याचा संशय आहे .
प्राप्त माहितनुसार तालुका कृषी अधिकारी धिरज वाकोडे यांनी जळगांव जामोद पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील दोन विक्रेत्यांवर कलम ४२०,४६८,४७१ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात विक्रेत्यांना कंपनी कडून पुरवठा कमी व विक्री जास्त केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे.परंतु सदर प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन घोटाळ्यात कृषी अधिकारी दोषी असल्याची शंका आहे.यात आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १४३ प्रस्ताव अप्राप्त असताना त्या प्रस्तावाच्या अनुदानाची रक्कम अंदाजे ६५ लाख रुपये जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा कृषी तांत्रिक अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांनी कुठल्या आधारावर दिली? जिल्हा कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून शेतकर्यांची क्रॉस तपासणी, स्पॉट व्हेरिफिकेशन झाले नंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.
१४३ प्रस्ताव अप्राप्त असताना बेधुंद कृषी विभागाला कुंभकर्णी झोपेतून जाग का आली नाही हा अनुत्तरित प्रश्न निर्माण होतो.तालुका कृषी अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक यांनी अप्राप्त १४३ प्रस्तावांची तपासणी न करताच जिल्हा कृषी अधिकारी यांनी सदर प्रकरणाच्या अनुदानाची समंती कशी दिली? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
सोबतच तालुका कृषी अधिकारी धिरज वाकोडे यांनी फिर्याद दिल्यानंतर आपल्या कर्तव्यात अर्थपूर्ण हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कुठलाच गुन्हा किंवा कृषी विभागाकडून कुठलीच कारवाई केलेली नाही.सदर जळगांव जामोद प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन घोटाळ्याचा हा एक भाग आहे परंतु यात आणखी काही अधिकारी दोषी असल्याची शंका मात्र चर्चेचा विषय बनला आहे. त्यांची नावे पण लवकरच समोर येतील यात तीळ मात्र पण शंका नाही.














