किशोर सोनोने मलकापूर प्रतिनिधी :-
भीमनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहाराच्या सभागृहात क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
समाजभूषण डॉ. जी. ओ. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला मलकापूर नगरपरिषदेचे शिक्षण सभापती तथा ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आपल्या मनोगतात भाई अशांत वानखेडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकताना सांगितले की, “महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील शोषित, वंचित व दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य हे मानवतेच्या कल्याणाचे जिवंत दिग्दर्शन आहे. शिक्षण, समानता व सामाजिक न्याय या मूल्यांची रुजवात त्यांनी आपल्या कार्यातून केली असून आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.”
कार्यक्रमात विविध वक्त्यांनीही महात्मा फुले यांच्या विचारांची व कार्याची उजळणी करत त्यांच्या सामाजिक क्रांतीचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थितांनी फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समता आणि बंधुता निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. कुणालभाई वानखेडे (जयंती समिती अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमास ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेचे शहराध्यक्ष मोहन खराटे, दिलीप इंगळे, सतीश नाईक, राहुल क्षीरसागर, प्रशांत बगाडे, भारत महाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला-पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाला लाभल आहे.














