केळवद येथील कोट्यवधींच्या जमीन व्यवहारावरून वाद; शासन महसुलाला फटका बसल्याचा आरोप
चिखली (निलेश कवळे) तालुक्यातील केळवद येथे तब्बल ६ हेक्टर ९२ आर जमीन व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, सुमारे ५ कोटी २५ लाख रुपयांच्या कथित व्यवहारात शासनाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
सुधाकर पुंडलिक खरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धनंजय संपतराव सावंत आणि निर्मला सावंत यांनी १६ मे २०२४ रोजी नोटरीद्वारे ५.२५ कोटी रुपयांचा विक्री करार केला होता. त्यावेळी १ कोटी ७५ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, २२ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या अधिकृत खरेदीखतात केवळ १ कोटी रुपयांचा व्यवहार दाखवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या फरकामुळे शासनाचे सुमारे २१ लाख २० हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क टाळण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाची दिशाभूल झाल्याचाही आरोप असून, संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास हे प्रकरण आयकर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय तसेच सोशल मीडियापर्यंत नेण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.
दरम्यान, चिखलीतील हा बहुचर्चित जमीन व्यवहार आता जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला असून, प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार आणि शासन महसुलाला खरोखरच फटका बसला आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














