राजुरा शेतशिवारात हृदयद्रावक घटना; चार चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू
जळगाव जामोद (लोकसंवाद का. प्र):
तालुक्यातील राजुरा शेतशिवार रविवारी सकाळी एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने हादरून गेले. विजय मुसा किरडिया (वय ३०) यांनी आपल्या चार निष्पाप मुलांना विहिरीत टाकल्यानंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न करत जीव गमावल्याची घटना २५ मे रोजी सकाळी सुमारे ९ वाजता उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेत फिरीद विजय किरडिया (वय ७), कु. प्राची (वय ६), कु. पूर्वी (वय ४) आणि पीयूष (वय २) या चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, विजय किरडिया यांनी प्रथम चारही मुलांना विहिरीत फेकले. त्यानंतर विहिरीजवळील झाडाला दोरी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोरी अचानक तुटल्याने ते विहिरीत कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. एचडीपीओ आनंद महाजन आणि पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, इतक्या टोकाच्या निर्णयामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.














