जळगांव जामोद(प्रतिनिधी):-
येथील स्वातंत्र्य वीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या तन्मय जुमळे, विवेक काकडे, प्रशांत काळे, रोहित इंगळे,
करण काळपांडे, रघुनंदन रेड्डी, प्रतीक जावरकर विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ (बु) येथे चारा प्रक्रिया प्रयोगाबद्दल शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.
उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही. अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागते. पशुपालक जनावरांच्या आहारात दुय्यम घटकांचा (उदा. गव्हाचा पेंढा, भात पेंढा) जास्त वापर करतात. त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
निकृष्ट चाऱ्यामध्ये कार्बोदकांचे प्रमाण कमी आणि तंतुमय पदार्थ जास्त असतात. तसेच प्रथिने अत्यल्प असतात. त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. प्रक्रिये अंतर्गत त्यांनी युरियाचा उपयोग करून कोरड्या हरभऱ्याची (कुटार) पौष्टिकता कशी वाढवायची हे सांगितले आणि फायदे शेतकऱ्यांना पटवून दिले. युरिया प्रक्रिया केलेल्या चारा मध्ये प्रथिनांचे प्रमाण 1-1.5 टक्क्यापासून वाढते आणि पचनीय क्षमता 20 ते 30 टक्क्यांनी वाढते.चाऱ्याच्या पोषक घटकांमध्ये वाढ होते.
त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पनात देखील वाढ होते. जनावरांची शारीरिक वाढ प्रजनन क्षमता ही सुरळीत राखली जाते अगदी कमी खर्चात व कमी वेळात जनावरांना पौष्टिक सकस आहार उपलब्ध करून देता येतो. जनावरांच्या शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी, शरीराची वाढ, तंदुरुस्ती व स्वास्थ्यासाठी खाद्याची गरज असते.
म्हणून खाद्यात पुरेशी उर्जा व शरीराला लागणारी प्रथिने, क्षार व आवश्यक असणारी पोषकतत्त्वे यांचा समावेश पाहिजे. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी काही घटकही आहारात असावे लागतात. स्वातंत्र्य वीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी तन्मय जुमळे, विवेक काकडे, रोहित इंगळे, प्रशांत काळे, रघुनंदन रेड्डी, करण काळपांडे, प्रतीक जावरकर,यश जाधव,जयंत नानी, प्रतीक इलामे, उल्हास इंगळे, या विद्यार्थ्यांना प्राचार्य योगेश गवई व कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे कार्यक्रम समन्वयक प्रा. विद्या कपले आणि विषय तज्ञ प्रा. नम्रता खिरोडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.














